पुस्तक – चार्वाक (Charvak)
लेखक – सुरेश द्वादशीवार (Suresh Dwadashiwar)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – १३२
प्रकाशन – साधना प्रकाशन मार्च २०२१
छापील किंमत २००/- रुपये
ISBN – 978-93-92962-21-9
पुणे पुस्तक महोत्सवात खूप वेगवेगळ्या विषयांवरची, वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं बघायला मिळत होती. अशाच एका स्टॉलवर लक्ष गेलं या पुस्तकाकडे – “चार्वाक”. हा विषय कमी वाचनात आलेला म्हणून पुस्तक लगेच विकत घेतलं.
चार्वाक म्हटलं की हा श्लोक आठवतो
यावज्जीवेत सुखं जीवेत ऋणं कृत्वा घृतं पिबेत, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः ||
अर्थात जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत मजेत जगा. कर्ज काढून तूप प्या (चैन करा). मेल्यानंतर देहाची राख होणार आहे. मग कुठला पुनर्जन्म आणि कशाची चैन? असे चार्वाकाचे सांगणे आहे असे वाचण्यात येते. चार्वाक नास्तिकमत मांडणारा आहे. या देहाचे सुख, आत्ताच्या जगातलं सुख हे महत्त्वाचं आहे. पूर्वजन्म, पुनर्जन्म, ईश्वर यांची पर्वा न करता जगायला सांगणारा अशी साधारण समाजातली समजूत आहे. तशीच माझीही आहे. तरीही भारतीय तत्त्वज्ञानातले द्वैत- अद्वैत, आस्तिक – नास्तिक, सांख्य , योग असे वेगवेगळे मतप्रवाह मांडताना चार्वाकांचं नावही नेहमी येतं. त्यामुळे या महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वाचं अजून योगदान काय आहे; त्याचे तत्वज्ञान अजून काय आहे हे समजून घेण्याची मला उत्सुकता वाटली. पुस्तकाचा पाठ मजकूर बघितला तर त्यात असा उल्लेख आहे की “चार्वाकांचा एकही ग्रंथ सध्या संशोधकांना सापडलेला नाही. त्यांची परंपरा समजली नाही की तिचे अवशेषही हाती लागले नाहीत”. आता मला गंमत वाटली की, काहीच उपलब्ध नसताना लेखकाने १२० पाने काय बरं मजकूर लिहिला असेल? त्याने स्वतः संशोधन करून आत्तापर्यंत न सापडलेलं काही शोधून काढलं की काय? म्हणून उत्सुकतेने पुस्तक विकत घेतलं.
पुस्तकाचं सांगणं असं आहे की… चार्वाक बुद्धीप्रामाण्य मानणारे होते. प्रत्यक्ष अनुभव, प्रमाण, अनुमान, तर्क यातून जे ज्ञान मिळतं तेच खरं. त्याहून वेगळं कोणी सांगत असेल तर त्या फक्त कल्पनाच. ईश्वर सृष्टीचा निर्माता, स्वर्ग-नरक, पूर्वजन्म, पुनर्जन्म, या गोष्टी कोणीही न पाहिलेल्या प्रत्यक्ष न अनुभवलेल्या. त्या खऱ्या नाहीत. मोक्ष, ब्रह्म, आत्मा वगैरे भानगड पण काही खरी नाही. “जग खोटं आहे आणि ब्रम्ह सत्य आहे” असं मानण्यात काही हशील नाही. उलट हे जगच खरं आहे. तेच समजून घेतलं पाहिजे. या जगात सुखी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशी चार्वाकांची विचारसरणी आहे. “ऋणं कृत्वा घृतं पिबेत” हा मूळ चार्वाकांचा श्लोक नसून त्यांच्यावर टीका करण्यासाठी त्यांना भोगीविलासी ठरवण्यासाठी नंतरच्या लोकांनी त्यांच्या श्लोकाचा असा विपर्यास केला आहे.
लेखकाचं म्हणणं असं आहे की हजारो वर्ष चालत आलेली वैदिक परंपरा स्थिरस्थावर होण्याच्या आधी सुद्धा चार्वाकमत अस्तित्वात होतं. त्याला “लोकायत” मत असं म्हटलं जायचं. पण पुढे वैदिक संस्कृती असो, बौद्ध धर्म असो की जैनधर्म; प्रत्येक पंथाला आपापल्या श्रद्धा अत्यावश्यक वाटत होत्या. त्यांनी चार्वाकांना वैचारिक हद्दपार केलं. समाजाला खोट्या संकल्पनांच्या नादी लावलं. ईश्वर न मानणारे गौतम बुद्ध सुद्धा त्यांच्या शिष्यांना चार्वाकाचे ग्रंथ वाचू नका, त्याचा उपदेश ऐकू नका असा संदेश देतात. पाश्चात्य धर्मांना कदाचित चार्वाक हे नाव माहिती नसेल. पण पाश्चात्य धर्म सुद्धा – मी म्हणतो तेच सत्य; मी म्हणतो त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा – अशीच आज्ञा देतात. धर्माला प्रश्न विचारणारे वैज्ञानिक, बायबल मधलं ज्ञान खोटं आहे असं सांगणारे समाजसुधारक यांना ग्रीक व रोमन लोकांनी विरोधच केला. थोडक्यात तिकडेही चार्वाकवृत्तीला वैचारिकतेतून हद्दपार करण्यात आले होते.
पूर्वीच्या काळी पाऊस, वारा, सूर्य ह्यांना देव म्हणून पूजलं जायचं मग ईश्वर या संकल्पनेचा विकास झाला. प्रतीकं आली मूर्ती आल्या वगैरे गोष्टी मांडल्या आहेत. माणूस भीतीपोटी किंवा अजून लाभ व्हावा यासाठी स्वतःच्या कल्पनेतून प्रथा, परंपरा, पूजा तयार केला. अस्तित्वात नसणाऱ्या देवाला मागणीपत्रे पाठवण्याचा खटाटोप ह्याहून जास्त त्याला अर्थ नाही. संतमहात्म्यांचा उद्देश उदात्त असला तरी उपदेश मात्र लोकांना भोळसट बनवणारा आहे.
पुस्तकाच्या प्रतिपादनाचा हा मूलाधार आहे. हाच मुद्दा पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या पैलूंनी सांगितलेला आहे. या पुस्तकात पंधरा लेख आहेत. अनुक्रमणिकेवरती एक नजर टाकली की त्यांचे विषय कळतील.

हे पुस्तक वाचायला घेताना माझी अपेक्षा अशी होती की चार्वाकांचा काळ, आयुष्य, कार्य, विचारसरणी, त्यांची परंपरा, विचारपद्धतीचे वेगवेगळे पैलू या सगळ्याबद्दल माहिती मिळेल. पण पुस्तकाने साफ निराशा केली. वर म्हटल्याप्रमाणे चार्वाकांचे ग्रंथ उपलब्ध नाहीयेत आणि ह्या लेखकालाही त्याहून जास्त काही माहिती नाहीये. त्यामुळे पूर्ण पुस्तक वाचून माहितीत फार भर पडत नाही. चार्वाकांबद्दल माहिती नाही तर मग १२० पानं काय लिहिले हा प्रश्न आता तुम्हालाही पडला असेल.
लेखकाचा सगळा भर हे दाखवण्यावर आहे की आजच्या सर्व धर्मांमध्ये भरपूर दोष आहेत. धर्माधर्मांमध्ये संघर्ष चालू आहेत. धार्मिक माणसांमुळे नीती प्रस्थापित झाली आहे असं काही दिसत नाही. धर्मसत्ता, राज्यसत्ता आणि धनसत्ता हे एकत्र येऊन लोकांना मूर्ख बनवण्याचे धंदे चालू आहेत. लोकही त्यामागे इतके वेडे झाले आहेत की वेगळा विचार करणारा माणूस त्यांना नको वाटतो. थोडक्यात आजचे धर्म सर्व वाईट. त्याचा व्यत्यास म्हणून चार्वाकांची परंपरा विचारपद्धती योग्य !! हेच पुन्हा पुन्हा पटवून देण्यासाठी त्यांनी आत्ताच्या धर्मातली वैगुण्ये विशद केली आहेत. थोडक्यात चार्वाकांची उंची दाखवण्याऐवजी प्रस्थापित धर्मांचं खुजेपण दाखवले आहे.
लेखकाने मांडलेले मुद्दे अयोग्य आहेत असं नाही. पण हे मुद्दे काही नवीन नाहीत? “देव दानवा नरे निर्मिले हे मत लोकां कावळू द्या” हे केशवसुतांनी शंभर दीडशे वर्षांपूर्वीच लिहून ठेवलं आहे. युरोपामध्ये झालेला रेनेसांस, भारतामध्ये झालेले प्रबोधनपर्व, समाजसुधारणा आणि आजही चालू असलेल्या सुधारणा यातून प्रत्यही हे मुद्दे पुन्हापुन्हा चर्चिले जातातच. देव आहे की नाही? पुनर्जन्म म्हणावा की नाही? पूजा करावी की नाही? मंदिरे, चर्च मशिदी इत्यादींची गरज आहे का? याबद्दल सतत चर्चा चालू असते. थोडक्यात श्रद्धा का बुद्धीप्रामाण्य हा वाद कायम टिकणार आहे.
लेखकाचं म्हणणं असं आहे की वेदपूर्वकाळात “लोकायत” अर्थात चार्वाकांचे मतच प्रचलित होते. हे वाचून मला असा प्रश्न पडला की ते जर प्रचलित होते तर ईश्वर, श्रद्धा, धर्म यांची गरज माणसाला का पडली? गरज ही शोधाची जननी आहे त्याअर्थी चार्वाकांच्या मतात काय कमतरता होती ज्यामुळे माणसाला ईश्वर, पूजाअर्चना, आराधना यांची निर्मिती करावी लागली? फक्त भारतात नाही तर जगभर. ह्याबद्दल लेखक ताकदीने बोलत नाही.
अनुभवजन्य ज्ञान महत्त्वाचं आहे हे म्हणणं १००% योग्य. पण एवढं एक वाक्य पुरेस होत नाही ना! डेव्हिल लाईज इन द डिटेल्स. जसजशी लोकसंख्या वाढली, श्रमविभागणी झाली, लोक एकमेकांवर अवलंबून राहू लागले, व्यवहारांची व्याप्ती वाढली तेव्हा समाजाची धारणा करण्यासाठी नियम आले, कायदे आले, नीती- अनीती आली, शिक्षा आल्या, न्याय- अन्याय आला. चार्वाकमतानुसार या सगळ्याची व्यवस्था कशी लावली जाईल याची तपशीलवार मांडणी करण्याची करणे लेखकाने टाळले आहे. समाजव्यवस्था चांगली टिकण्यासाठी, हजारो प्रकारच्या स्वभाव आणि इच्छाआकांक्षा असणाऱ्या माणसांना एकत्र घेऊन समाज टिकवण्यासाठी काय केले पाहिजे याबद्दल पुस्तक पूर्णपणे मौन बाळगतं. केवळ चार्वाकमत आधीपासून अस्तित्वात होतं म्हणून ते योग्य महान कसं म्हणणार? फारफार तर ती अप्रगत समाजाची पहिली पायरी होती इतकंच. पुढच्या पायऱ्यांवर जाताना मानवजातीचा पाय थोडा घसरत असेल म्हणून “पहिली पायरीच बरी” असा तर्क प्रतिपादित होतो.
आज आपण आजूबाजूला बघतो की सगळ्या सुखसोयी असणारी बरीच माणसं सुद्धा मनाने समाधानी व आनंदी नसतात. काहीतरी उणीव राहिली आहे असं त्यांना वाटत असतं. अशावेळी केवळ भौतिक समाधानापेक्षा वेगळं आत्मिक समाधान त्यांना हवं असतं. या सगळ्याचा ताळमेळ चार्वाकमतात कसा घातला जातो हा कळीचा मुद्दा लेखक विचारात घेत नाही.
समाधी ध्यान आणि चार्वाक या प्रकरणात समाधी , मनाची एकाग्रता ह्या बद्दल थोडं लिहिलं आहे. इथे तर प्रत्यक्ष अनुभव आहे. आजपर्यंत कितीतरी योगी मुनींनीसन्यास्यांनी तो घेतलेला आहे. याची उदाहरणे स्वतः लेखकाने दिली आहेत. योगमार्गाचा अवलंब करून कोणीही तो अनुभव घेऊ शकतो. इथे तरी चार्वाक आणि परंपरा यामध्ये विरोधाभास असण्याचे कारण नव्हते. हा अनुभव घेण्याचा प्रयत्न लेखकाने केला का किंवा स्वतःला नास्तिक म्हणणाऱ्यांनी हा अनुभव घेण्याचा प्रयत्न केला का याबद्दल लेखक काही लिहू शकला असता. पण ती निसरडी वाट आहे हे लक्षात येताच; धर्मात असे चमत्कार सांगितले आहेत, चमत्कारांवर विश्वास ठेवू नये बुद्धी वापरावी हीच कॅसेट पुन्हा सुरू होते.
फक्त एक चांगली बाब म्हणजे फक्त हिंदू धर्म किंवा भारतीय धर्म यांच्यावर टीका न करता ख्रिश्चन आणि इस्लाम यांच्या यांची उदाहरणे सुद्धा दिली आहेत. त्यांच्या मधले दोषही दाखवलेले आहेत.
“चार्वाक” या नावाने जरी पुस्तक असलं तरी यातला “चार्वाक” हा शब्द गाळून त्याजागी बुद्धीप्रामाण्य किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन असं म्हटलं असतं तरी या पुस्तकाच्या मजकुरामध्ये काही फरक पडला नसता.
थोडक्यात मला हे पुस्तक आत्ता नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीतल्या प्रचारासारखे वाटले. जोतो उठतो आणि दुसऱ्या पक्षावर भ्रष्टाचाराचे, गैरव्यवहाराचे आरोप करतो. दुसऱ्याच्या चुकीच्या निर्णयांमुळे बेरोजगारी आणि गरिबी कशी वाढली, प्रदूषण कसं वाढलं हे सगळं सांगतो. पण ह्यावर उपाय म्हणून मी ठोस काय करीन हे सांगत नाहीत. माझ्या उपायांचा फायदातोटा काय, त्याची किंमत किती, दीर्घकाळ टिकण्याची क्षमता किती, त्यासाठी काय त्याग करायला लागेल हे कोणी सांगत नाही. एकदा मला निवडून द्या स्वर्ग तुमच्या समोर. तसंच हे पुस्तक इतरांच्या चुका दाखवत स्वतःची मूठ झाकलेली ठेवत, उज्ज्वल भवितव्याची आशा दाखवतं. जुन्या निडणूक घोषणेच्या – “न जात पर-न पात पर, इंदिरा जी की बात पर” च्या धर्तीवर “न जात पर ना पात पर, चार्वाकजी के बात पर” !!
मी दिलेली पुस्तक श्रेणी
———————————————————————————-
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
इतर सामाजिक,ऐतिहासिक पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे
- १९४८ चं अग्नितांडव (1948 cha Agnitandav) – रंगा दाते (Ranga Date)
- आवरण (AavaraN) – डॉ. एस. एल. भैरप्पा (Dr. S. L. Bhairappa )- (अनुवाद : उमा कुलकर्णी (Uma Kulakarni)
- आमेन-द ऑटोबायोग्राफी ऑफ अ नन(Amen-the autobiography of a nun) – सिस्टर जेस्मी (Sister Jesmi) ( अनुवाद: सुनंदा अमरापुरकर Sunanda Amrapurkar)
- इतिहासाच्या पाऊलखुणा दिवाळी अंक २०१९ Itihasachya Paulkhuna Diwali special Edition 2019
- इतिहासाच्या पाऊलखुणा दिवाळी अंक २०२० Itihasachya Paulkhuna Diwali special Edition 2020
- कृष्णदेवराय (krushadevarai) – डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली (Dr. Laxminarayan Bolli)
- कैफा हालक ओमान (kaiphaa halak Oman ) – सुप्रिया विनोद (Aupriya Vinod)
- काबूल-कंदाहारकडील कथा (kAbul-kandAhArakadil katha)-प्रतिभा रानडे (pratibhaa raanaDe)
- दारा शिकोह (Dara Shikoh) – काका विधाते (Kaka Vidhate)
- बलुचिस्तानचे मराठा : एक शोकांतिका (Baluchistanche Maratha : Ek Shokantika) – नंदकुमार येवले (Nadkumar Yewale)
- मंत्रावेगळा (Mantravegala) – ना. सं. इनामदार (Na. S. Inamdar)
- नवे शैक्षणिक धोरण (Nave shaikashnik dhoran) – प्रा. डॉ. नितीन करमळकर आणि मंगला गोडबोले (Pro.Dr. Nitin Karmalkar & Mangala Godbole)
- शिवनेत्र बहिर्जी (Shivanetra Bahirji) – प्रेम धांडे (Prem Dhande)
- सेर सिवराज है (Ser Sivaraj hai) – प्रा. वेदकुमार वेदालंकार (Pro. Vedkumar Vedalankar)
- सेपिअन्स – मानवजातीचा अनोखा इतिहास (Sapiens – Manavjaaticha anokha itihas) – युव्हाल नोआ हरारी (Yuval Noah Harari)
- हा तेल नावाचा इतिहास आहे!… (ha tel navacha itihas ahe!..) – गिरीश कुबेर (Girish Kuber)
- मी सरकारी डॉक्टर (Mi sarakari doctor) – डॉ. कुमार ननावरे (Dr. Kumar Nanaware)
- मेड इन चायना (Made in China) – गिरीश कुबेर (Girish Kuber)
- अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala) – युवाल नोआ हरारी (Yuval Noah Harari) अनुवादक – प्रणव सखदेव (Pranav Sakhadev)
- खुलूस (Khuloos) – समीर गायकवाड (Sameer Gaikwad)
- Deep state (डीप स्टेट) – मंदार जोगळेकर ( Mandar Joglekar)
- विद्रोह (Vidroh) – हेन्री डेन्कर (Henry Denker) अनुवाद – लीना सोहोनी (Leena Sohoni)
- तिमिरपंथी (Timirapanthi) – ध्रुव भट्ट (Dhruv Bhatt) अनुवाद – सुषमा शाळिग्राम (Sushama Shaligram)
- जा जरा पूर्वेकडे (Ja jara purvekade) – आशुतोष जोशी (Ashutosh Joshi) अनुवाद – सविता दामले, मोहना प्रभुदेसाई जोगळेकर (Savita Damle, Mohna Prabhudesai Joglekar)
- वर्दीतल्या माणसाच्या नोंदी (Vardeetalya manasachya nondi) – सदानंद दाते (Sadanand Date)
अजून पुस्तक परीक्षणे
हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या सुमारे तीनशे पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–
गंमत चिनी भाषेची मराठीतून
२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level ३ परीक्षा मी ९३% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link


