पुस्तक – शरद जोशी शोध अस्वस्थ कल्लोळाचा! (Sharad Joshi – Shodh asvastha kallolacha!)
लेखिका – वसुंधरा काशीकर भागवत (Vasundhara Kashikar – Bhagwat)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – १५३
प्रकाशन – राजहंस प्रकाशन ऑक्टो २०१६
छापील – किंमत दोनशे रुपये
ISBN 978-81-7434-978-6

शेतकऱ्यांची आंदोलने, आत्महत्या, हमीभावाचा प्रश्न याबद्दलच्या बातम्या आणि चर्चांमध्ये एक नाव नेहमी ऐकण्यात येतं ते म्हणजे – शरद जोशी. शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा किंबहुना मुक्त बाजारपेठेचा फायदा त्यांना घेता यावा अशी त्यांची भूमिका होती हे साधारण ऐकून मला माहिती होतं. “इंडिया विरुद्ध भारत” ही संकल्पना सुद्धा त्यांनी मांडली आहे असही ऐकलं होतं . या तीन शब्दातून खूप मोठा आशय, सामाजिक दरी, विकासाचं दुभंग चित्र आपल्यासमोर उभे राहतं. त्यामुळे त्यांच्याबद्दल अजून जाणून घ्यायची उत्सुकता होती. म्हणून ह्या पुस्तकाचा फोटो फेसबुकवर बघितल्यावर ते विकत घेऊन वाचून काढले.

पुस्तक लेखनेच्या प्रेरणे बद्दल लेखिका मनोगतात म्हणते “… शेतकरी संघटक, आंदोलक, नेता, अर्थशास्त्री ही शरद जोशींची ओळख इतिहासात राहीलच पण हे हिमनगाचं वर दिसणार एक टोक आहे असं शरद जोशींच्या व्यक्तिमत्वाबाबत म्हणता येईल. यापलीकडचे तीन चतुर्थांश शरद जोशी लोकांसमोर आणले पाहिजेत असं वाटलं. शरद जोशींची ज्ञानलालसा, अनुभव घेण्यासाठी वाटेल ती किंमत देण्याची तयारी, जोखीम पत्करण्यासाठी लागणारे अचाट साहस, जीवनाचा शोध घेण्याची धडपड, अखंड कार्यमग्नता, विषयाच्या मुळापर्यंत जाऊन त्याला भेदण्याची वृत्ती, तर्कभक्ती, भाषेच्या शुद्धतेचा आग्रह हे सगळं लोकांना कळलं पाहिजे असं कळकळीने वाटलं…”

लेखिका वसुंधरा काशीकर या शरद जोशींच्या संघटनेच्या कार्यकर्त्या किंवा आंदोलनकर्त्या नव्हेत. त्या दोघांची घरगुती ओळख होती. वयाने त्या जोशींपेक्षा बऱ्याच लहान तरीही पुस्तके वाचणे, सामाजिक चिंतन करणे, गझल, कविता अशा अनेक आवडीनिवडी जुळल्या. छान मैत्रीचे नाते निर्माण झाले. त्यातून वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या निमित्ताने भेटी झाल्या आणि चर्चाही झाल्या. त्या वेगवेगळ्या भेटींचे अनुभव आपल्याला सांगितले आहेत. शरद जोशी ह्यांच्या व्यक्तिमत्त्वाची विविधांगी अंगाने कशी ओळख झाली हे आपल्याला कळतं आणि ते पैलूही कळतात. बरीच वर्षे लेखिका शरद जोशींच्या संपर्कात असल्यामुळे वयाच्या आणि कारकिर्दीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांच्यात झालेले बदल, त्यांच्या अभिव्यक्तीत झालेले बदल आणि तरीही त्यामागे एका वैचारिक अधिष्ठानाचं सातत्य सुद्धा या पुस्तकातून आपल्याला दिसतं. जोशींनी मांडलेले मुद्दे आणि त्यावर लेखिकेचे स्वतःचे विचार मंथन लेखिकेने पुस्तकात मांडले आहे. जोशींच्या शब्दांमागची त्यांची भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात आहे.

पुस्तक कालानुक्रमे असे मांडलेले वर्णन नाही . तर १८ लेखांचा संग्रह आहे. एकेक मध्यवर्ती संकल्पना घेऊन त्याबाबत जोशींचे अनुभव, त्यांच्या लिखाणातून त्यांनी मांडलेले विचार, त्यावर लेखिकाचे भाष्य असे लेखाचे स्वरूप आहे. काही निवडक लेखांबद्दल सांगतो म्हणजे स्वरूप साधारण लक्षात येईल.

“साहित्य, भाषा आणि शरद जोशी” नावावरून लक्षात आलं असेल की शरद जोशींचे वाचन प्रेम साहित्यप्रेम याबद्दलचा हा लेख आहे. “दुनिया की नसीहत पर भी” या लेखात उत्तरआयुष्यात त्यांना सतावणारा एकाकीपणा जाणवतो. बुद्धिवादी तर्कनिष्ठ अशा भूमिकेतून भक्तीयोगाचा अभ्यास करायचा तो अनुभवायचा त्यांचा प्रयत्न आपल्याला दिसतो.

“योगदान” या लेखामध्ये त्यांनी मांडलेली वैचारिक भूमिका व तत्त्वज्ञान याचा वेध घेतला आहे. एखादं आंदोलन हे विशिष्ट विषयापुरतं असतं. तो विषय मार्गी लागला की आंदोलन संपतं. पण विचारधारा व तत्त्वज्ञान हे दीर्घकाळ टिकणारं असतं. येणाऱ्या काळात कशी वाटचाल करावी याचं मार्गदर्शक ठरतं. त्यामुळे असं संचित आपल्या अनुयायांना देऊ शकणारा नेता हा खरा द्रष्टा, लोकोत्तर नेता. त्याबाबतीत शरद जोशी कसे उजवे ठरतात या लेखातून आपल्याला कळतं.

तरुणपणी शरद जोशी हे युनायटेड नेशन्स मध्ये स्वित्झर्लंड मध्ये काम करत होते पण शेती विषयक प्रश्नाच्या तळमळीतून त्यांनी ती नोकरी सोडली पत्नी आणि दोन मुलींसह ते भारतात आले महाराष्ट्रात कोरडवाहू शेती घेऊन स्वतः शेतीत त्यांनी प्रयोग केले प्रचंड ज्ञान आणि विद्वत्तेला अशा प्रकारे प्रत्यक्ष अनुभवाची जोड देऊन ते शेतकरी प्रश्नाकडे उतरले. म्हणूनच जीन्स शर्ट घालणारा हा नेता, ब्राह्मण नेता बहुजन समाजाने आपला मानला. त्यांच्या अनुयायांनी त्यांच्याबद्दल व्यक्त केलेल्या भावना, त्यांच्या मृत्यूपश्चात दिसलेले अनुयायांमध्ये दिसलेले भावुक क्षण हे सुद्धा लेखांमध्ये दिसतात.

आता काही पाने उदाहरणादाखल
पुस्तकात दिलेली लेखिकेची माहिती

अनुक्रमणिका

स्वातंत्र्य हे शरद जोशींसाठी सर्वोच्च मूल्य कसं होतं हे सांगणारा लेख

परदेशातली नोकरी सोडून भारतात येण्याच्या निर्णयावर लेखिकेच्या मनातले विचारतरंग


शरद जोशींचं वक्तृत्व कसं होतं ह्याबद्दल.

सतत चिंतन करणे; प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेणे; त्यासाठी नवनवीन प्रयोग करणे ही एका अर्थाने सकारात्मक अस्वस्थता. शरद जोशींनी ती आयुष्यभर जोपासली असे या पुस्तकातून जाणवते. म्हणून “शोध अस्वस्थ कल्लोळाचा” हे उपशीर्षक पटते.
या पुस्तकांची रचना लेखसंग्रह स्वरूपाची असल्यामुळे प्रत्येक लेख स्वतंत्र स्वयंपूर्ण ठेवण्याचा लेखिकाचा प्रयत्न दिसतो. त्यामुळे कुठल्याही क्रमाने लेख वाचले तरी आपल्याला काही अडचण नाही. पण त्यामुळे बऱ्याच लेखांमध्ये मुद्द्यांची पुनरावृत्ती होते. विश्लेषणाच्या एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे तपशील जात नाही.
मी जेव्हा पुस्तक विकत घेतलं तेव्हा मला असं वाटलं की हे शरद जोशींचं चरित्र आहे. किमान त्यांच्या कामाची माहिती देणारे आणि त्याचे विश्लेषण करणारे पुस्तक असेल. पण पुस्तक वाचल्यावर लक्षात आलं की ते तसं नाही. हे लेखिकेचं अनुभवकथन आहे. तिचं स्वतःचं त्यावरचं भाष्य आहे. लेखिका प्रत्यक्ष कार्यकर्ती किंवा आंदोलनकर्ती नसल्यामुळे तिचे अनुभव थेट त्या कार्याच्या गाभ्याला भिडणारे नाहीत. ही या लेखनाची मर्यादा आहे. त्या कार्यकर्त्यांचे अनुभव, शरद जोशींच्या कुटुंबीयांचे अनुभव, समकालीनांचे विचार हे जर मांडता आले असते तर पुस्तक अजून प्रभावी झालं असतं.

माझ्यासारख्याला ज्याला शरद जोशींच्या आयुष्याची, कामाची आणि त्याच्या परिणामांची झालेल्या परिणामांची फारच जुजबी माहिती आहे त्याला हे पुस्तक तितकं रिलेट करता येत नाही. हे पुस्तक वाचताना सतत असं वाटत राहतं की आधी आपण शरद जोशींचं चरित्र वाचावं किंवा थेट त्यांनी केलेलं लिखाण वाचावं. असं वाटायला लावणं हेच कदाचित ह्या पुस्तकाचं यश म्हणावं लागेल.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

इतर ऐतिहासिक, सामाजिक पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या सुमारे तीनशे पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

My book reviews

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link